अहमदनगर प्रतिनिधी – नगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून काल सायंकाळी सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. रात्रीपासून नगर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिना नदीला पुर परिस्थिती असून नगर-कल्याण महामार्ग, नालेगांव, सावेडी आदी भागातील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे बंद झाली आहे. नगर शहरातील रस्तेही जलमय झाले असून सखल भाग असलेल्या नालेगांव परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.
नगर शहरातील सिना नदीला देखील पूर, नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक बंद, ट्रॅव्हल्स अडकली..
नगर शहरातील कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलावर एक ट्रॅव्हलर बस पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे. बसमधील चालकाला स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.पोलीस प्रशासनाच्या वतीने सीना नदी काठावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी पुलावरून वाहने घालू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई आणि परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली असून धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्गात कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण एवढे आहे की पिंपळगाव माळवी तलाव याच पावसात शंभर टक्के क्षमतेने भरू शकतो, अशी शक्यता आहे. बाजरी पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा होतीच. पण मूग आणि कांदा हे हाताला आलेली पिके या पावसामुळे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.