महापौरांच्याच प्रभागात महिलांची पाण्यासाठी वणवण
रिकामे हंडे डोक्यावर घेऊन महिलांनी नोंदवला महापालिका प्रशासनाचा निषेध
वारंवार नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन, मोर्चे व रस्तारोकोची भूमिका घ्यावी लागते – सविता कोटा
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
मागील काही महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने शहरातील नगर-कल्याण रोड,शिवाजीनगर येथील बालाजी सोसायटीतील महिलांनी नळाची पूजा करुन अनोखे आंदोलन केले.महापौरांच्याच प्रभागात अशी परिस्थिती असल्याने स्थानिक महिलांनी रिकामे हंडे डोक्यावर घेऊन महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला.तर अनेकवेळा पाण्यासाठी पाठपुरावा व आंदोलन करुन देखील महापालिका प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग येत नसल्याने पाणी मागण्यासाठी देखील आता लाज वाटत असल्याची संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली.

नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर येथील बालाजी सोसायटीत मागील काही महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी येते.पाणी आले तरी बराच वेळ दुषित पाणी नळाद्वारे येत असते.सध्या दहा ते बारा दिवस उलटून देखील पाणी आले नसल्याने महिलांना नवरात्र उत्सवात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.घरात पिण्यासाठी पाणी नसल्याने पाण्याचे बॉक्स व पाण्याचे जार विकत आणण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे. या भागात पाण्याचा कायमचाच प्रश्न असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
सविता कोटा म्हणाल्या की, या भागातील पाणीप्रश्नासाठी यापुर्वी नगर-कल्याण रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यानंतर पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला.नंतर पुन्हा प्रश्न उद्भवल्यानंतर महापालिकेवर हंडा मोर्चा काढून हा प्रश्न तात्पुरता मार्गी लावण्यात आला. मात्र वारंवार नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन,मोर्चे व रस्तारोकोची भूमिका घ्यावी लागत आहे.स्थानिल लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न कायमचा सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.