अहमदनगर (प्रतिनिधी)
भारतास स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग, घेतलेली कठोर मेहनत एवढेच नाहीतर या लढ्यातील शहीद यांचे कायम हे या पिढीला स्मरण राहावे या करिता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस तरुण – तरुणींनी दाखविलेला उत्साह हा खरोखरीच कौतुकास्पद असून ज्या ज्या वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नवनवीन संकल्प करतील तेव्हा तेव्हा तरुण – तरुणींनी असेच सहकार्य करावे असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर “हर घर तिरंगा” अभियानाच्या माध्यमातून आज अहमदनगर शहरात मोठ्या दिमाखात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, असा जय घोषात करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वंसंध्येला आयोजित या रॅलीच्या सांगता समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट रोजी होत असून या अमृत कालखंडात देशाने केलेली प्रगती ही अवर्णीय अशीच असून देशाचे नेते नरेंद्र मोदी हे आता विश्वाचे नेते झाले आहेत. महासत्ता असलेले राष्ट्र हे मोदीजी यांना पाठिंबा देत आहेत. देश आता आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून येणाऱ्या कालखंडात भारतीय अर्थव्यवस्था ही तीन नंबरची होईल असा आशावाद या वेळी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष श्री अभयतात्या आगरकर, माजी महापौर श्री बाबासाहेब वाकळे, श्री महेंद्र गंधे, श्री अक्षय कर्डिले ,श्री सुरेंद्र गांधी, श्री धंनजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रॅलीची सुरुवात मार्केट कमिटी येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करून झाली. माणिक चौक येथे स्वातंत्र सेनानी सेनापती बापट व कारंजा चौक येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन देखील करण्यात आले.
न्यू आर्टस् कॉलेज येथे हुतात्मा करवीर चौथे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करुन बाईक रॅली ची सांगता करण्यात आली.
या रॅलीत नगरसेवक, भाजप पदाधिकारी, तरुण – तरुणी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.