शहरामध्ये सुरु असलेले भारनियमन त्वरीत बंद करा राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवेळी अचानक पणे कुठलीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडीत केला जातो.त्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे व नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
नगर शहरामध्ये सध्या तीव्र स्वरुपाचा उन्हाळा जाणवत आहे.सुमारे ४२ च्या वर तापमान असल्यामुळे नागरीक उन्हाळयामुळे त्रस्त झाले आहेत.वीज पुरवठा वेळोवेळी खंडीत होत असल्यामुळे उन्हाळ्यात नागरीकांना रात्र जागुन काढावी लागत आहे.याच बरोबर अधिकारी व कर्मचारी संपर्क साधला असता दूरध्वनी उचलत नाही.
नागरिकांना अघोषित भारनियमनाची कुठलीही पूर्वसूचना मिळत नाही.त्यामुळे चालू असलेले अघोषित भारनियमन रद्द करा व येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिला.
शहरामध्ये सध्या प्राथमिक तसेच माध्यमिक वर्गाच्या विदयार्थीच्या वार्षिक परिक्षा सुरु आहेत वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मुलांच्या आभ्यासावर परिणाम होत आहे.त्याच प्रमाणे सध्या शहरात सर्व धर्माचे धार्मिक सणांचे वातावरण आहे.रामनवमी, रमजान महीना, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती अशा स्वरुपाचे धार्मिण सण, उत्सव मोठ्या प्रमाण सुरु आहेत.
कोणतीही पुर्वसुचना न देता अचानक विज पुरवठा खंडीत होत आहे.त्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडीत झाल्याने उत्सव साजरे करण्यास अडचणी निर्माण होत आहे.याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये महावितरण कार्यालयात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे, जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, महिला जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, जॉय लोखंडे अंजली आव्हाड, संतोष ढाकणे, खंडू काळे, नितीन लिगडे, सिताराम काकडे, दिपक खेडकर, रुपेश चोपडा, गजेंद्र भांडवलकर, अमित खामकर, संजय दिवटे, यश लिगडे, निलेश घुले, महेंद्र कवडे, देविदास टेमकर, अलिशा कांबळे, मिलिंद शिंदे, संजय खताडे, सुदर्शन ढवळे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणच्या कर्मचा-यांच्या बेजबाजदार कारभारामुळे भारनियमनाला शहरातील जनतेला सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळी रात्रीअपरात्रीच्या वेळी शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत केला जात असल्यामुळे रात्रीच्या वेळेस चो-यांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे अहमदनगर शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारनियम करु नये,अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्या कार्यालयामध्ये यापुढील काळात याहीपेक्षा तीव्र स्वरुपाचे आदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी व भारनियमन त्वरीत बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे महावितरण कार्यालयाला देण्यात आला.