आमदार संग्रामभैय्या जगताप व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देन्यात आले.
अहमदनगर प्रतिनिधी – जिल्ह्यातील मूळ पारनेर तालुक्यातील व्यवसायानिमित्त शिरूर येथे स्थायिक झालेल्या चोपडा कुटुंबीयांमध्ये युवा अभियंता आदित्य चोपडा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता.त्याच्या कुटुंबीयांनी सुपा पोलिस स्टेशन येथे रीतसर तक्रार देखील केली होती परंतु २९ सप्टेंबर रोजी दुपारी नारायण गव्हाण येथील महामार्गाच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत समाज माध्यम व प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

सदर घटनेमुळे चोपडा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.युवा अभियंता आदित्य चोपडा यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण होत आहे सदर घटना ही घातपात तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
त्यामुळे सदर मृत्यूच्या तपासाची सकल चौकशी करून चोपडा कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा व संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच सदर तपासामध्ये दिरंगाई व दिशाभूल केल्याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकावे यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशा मागणीचे निवेदन शहराच्या आमदार संग्रामभैय्या जगताप व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रा.माणिकराव विधातेसर, नगरसेवक विपुलभाई शेटिया, मा. नगरसेवक संजयमामा चोपडा, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,नगरसेवक प्रकाश भागानगरे, अजयशेठ मुथा, अजयशेठ बोरा, अमितशेठ मुथा, अमित मुथा, राजेंद्रजी गांधी, सफलजी जैन, कमलेशशेठ भंडारी, धनेशजी कोठारी, अभिषेकजी दायमा, बाबासाहेब सानप,आदी मान्यवर उपस्थित होते.
निवेदनात आमदार संग्रामभैय्या जगताप पुढे म्हणाले की, युवा उद्योजक व अभियंते आपले शिक्षण घेऊन व्यवसायाकडे वळत असतात त्यांच्या व्यवसायात आडकाठी घालण्याचे काम सुरू आहे.आदित्य चोपडा हे आत्महत्या करतील असे काहीच कारण नव्हते. त्यामुळे सदरची घटना ही आत्महत्या नसून हा घडवुन आणलेला घातपात आहे, त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत तरी या प्रकरणाची पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करून सदर कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.
यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निवेदन स्वीकारतांना शिष्टमंडळाला सांगितले की, सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून सदर प्रकरणामध्ये तात्काळ लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.