कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून उतरलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा प्रतिष्ठापना सोहळा अहमदनगरच्या खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबरला सकाळी ८ वा होतो आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी आणि आदर्श स्वराज्य कारभाराची शिकवण देत स्वराज्य ध्वजाने अवघ्या महिनाभराच्या प्रवासातच प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे लवकरच होणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील शिवपट्ट्ण किल्ल्यावर होणा-या या भव्य प्रतिष्ठापना व ध्वजारोहण सोहळ्याला राज्यभरातून अनेक माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत.आपल्या ७४ मीटर उंचीने नवी ओळख महाराष्ट्राला मिळवून देत जगातील व देशातील सर्वात उंच असा विक्रम प्रस्थापित करणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला कर्जत-जामखेडकरां सह राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशिर्वाद द्यावेत असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
कर्जतकर – जामखेडकर नागरिक आणि सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींनी खर्डा किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता केली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी स्वत: या सोहळ्याच्या स्थळाची म्हणजे खर्डा भुईकोट किल्ल्याला भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली आहे.
किल्ल्यासमोरच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारीसह स्वराज्य ध्वज यात्रेचे सहकारी व इतर स्थानिक हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. युवावर्गाने उत्साहाने या ध्वजारोहणाच्या निमित्ताने होणा-या स्वच्छता तसेच आयोजनात अत्यंत उत्साहाने भाग घेतल्याचं चित्र दिसत आहे.
कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणा-या व ७४ मीटर अशा विक्रमी उंचीने सर्वांच्या मनात भरलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने थोड्याच दिवसात अथक यात्रेकरवी जनमानसात आणि देशभरातही महाराष्ट्राच्या करारी इतिहासाची ओळख पोहोचवण्यात मोठं योगदान दिलं आहे.
३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार आहे
हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे.
असा हा मंगल ध्वज कर्जत-जामखेडवासियांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे.ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केली जात आहे. या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले.हि अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली.
हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. आता येत्या दस-याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना होईल आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला जाईल.