कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बबन बापू कुऱ्हाड,वय ५० वर्षे, राहणार डोंबाळवाडी हे गंभीररीत्या जखमी झाले असून,त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान या घटनेमुळे कर्जत तालुक्यात खळबळ उडाली असून,शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की,कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी गावाच्या शिवारामध्ये बबन बापू कुऱ्हाडे,रघुनाथ मारुती मासाळ,दादा कोंडीबा मासाळ, नवनाथ जगन्नाथ मासाळ व इतर दोन नातेवाईक असे सर्वजण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते.
यापैकी बबन कुऱ्हाडे व रघुनाथ मासाळ हे दोघेजण त्यांच्याकडील शेळ्यामेंढ्या चारण्याचे देण्याचे काम करत असताना शेजारी असणाऱ्या बाजरीच्या पिकांमध्ये बबन यांना हालचाल दिसली असता त्यांनी ही माहिती रघुनाथ मासाळ यांना सांगितली, बाजरीच्या पिकामध्ये कसलेतरी जनावर आहे.एवढी खात्री झाल्यानंतर आपल्या शेळ्या मेंढ्या चे रक्षण करण्यासाठी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न ओरडून या दोघांनी केला.
बबन कुराडे याच्या हातामध्ये काठी होती तर रघुनाथ मासाळ यांच्याकडे कुऱ्हड होती दोघेजण बाजरीच्या पिकच्या परिसरात जोरात ओरडून त्या अज्ञात प्राण्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत असताना, अकस्मात बिबट्यांनी बबन कुराडे यांच्या अंगावर बाजरी च्या पिकांमधून मधून थेट अंगावर झडप घातली व खाली पाडले,उजव्या हाताचा दंडाच्या लचका तोडला तसेच छातीच्या कडेला चावा घेतला.
दरम्यान शेजारी उभा असलेले रघुनाथ मासाळ हे यात अचानक घडलेल्या घटनेने घाबरून गेले मात्र तशाही परिस्थितीमध्ये जिवाच्या आकांताने ती जोरात ओरडले असताना पलिकडे शेतामध्ये असणारे दादा मासाळ,नवनाथ मासाळ व इतर दोघे जण त्याठिकाणी पळत आले. सर्वजण जोरदार आत व रडत असल्याचे पाहून बिबट्या तिथून पुन्हा बाजरीच्या पिकामध्ये उडी घेऊन पळून गेला.
आकस्मात हल्ला झाल्याने बबन कुराडे व रघुनाथ मासाळ हे दोघेजण प्रचंड घाबरलेले होते.तशाही परिस्थितीमध्ये इतरांनी त्यांना धीर देऊन खाजगी गाडीतून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ आणले.
प्राथमिक उपचार करून जखम खोलवर असल्यामुळे व आवश्यक असणारी इंजेक्शन उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे बबन कुऱ्हाडे यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालय मध्ये येऊन जखमी झालेले बबन कुराडे यांची भेट घेतली.तसेच तेथील डॉक्टरांशी चर्चा केली. वन विभागाचे अधिकारी यांना फोन करून तातडीने डोंबाळवाडी परिसरांमध्ये पथक पाठवून त्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली.नागरिकांमध्ये या घटनेमुळे घबराट पसरली आहे.तरी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हालचाल करावी असे यावेळी सांगितले.
त्या गावचे ग्रामसेवक विकास सामसे यांनी देखील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
डोंबाळवाडी परिसरात प्रथमच बिबट्या
कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी परिसरात प्रथमच बिबट्या आला आहे. वास्तविक पाहता या परिसरामध्ये डोंगर आणि दगड खडक आहे,लपण्यासाठी आवश्यक असा परिसर हा नाही,अल्प प्रमाणात बाजरीची पिके आहेत,यामुळे या ठिकाणी बिबट्या कसा आला हा प्रश्न निर्माण झाला असून,यापूर्वी येथून जवळच असलेल्या शेगुड गावाच्या पलीकडे करमाळा तालुक्यामध्ये मागील वर्षी मोठी दुर्घटना बिबट्याने हल्ला करून मारण्याची घडली होती.आता बिबट्या या परिसरात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सागर केदार (वन परिक्षेत्र अधिकारी रेहेकुरी)
आपण या परिसरामध्ये पाहणी केली असून त्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे. हे स्पष्ट झाले असून,या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून,याबाबत तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधण्यात आला आहे.