पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार
अहमदनगर प्रतिनिधी – कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती प्रत्येक भारतीयांना येण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने सामभारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रलंबीत प्रश्न व वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अॅड.कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.
कायद्याचे राज्य खर्या अर्थाने सुरू ठेवण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाला बरोबर न्यायसंस्थेवर येते.परंतु गेल्या तीस वर्षांत लाखो प्रलंबित खटल्यामुळे न्याय स्वस्तात, त्वरित आणि खर्या अर्थाने मिळण्याची शक्यता दुरावली गेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास न्यायसंस्थेवरुन कमी होताना दिसत आहे.
सामभारत तंत्राचा वापर मराठवाडा नामांतर आंदोलनाचा प्रश्न खर्या अर्थाने सुटण्यासाठी त्या वेळचे मुख्यमंत्री शरद पवार,स्व.बाळासाहेब ठाकरे,दिवंगत रा.सु.गवई, डॉ. कुमार सप्तर्षी,स्व.भाई वैद्य,समाजवादी नेते एस. एम.जोशी यांनी उन्नतचेतनेने केला आणि त्याचा उपयोग झाला.
या मार्गाचा अवलंब न केल्याने मुंबई गिरणी कामगारांचा संप मोडित निघाला आणि लाखो कामगार विस्थापित झाले.दिल्ली सिमेवर सुरु असलेले शेतकर्यांचे आंदोलन सामभारताच्या अभावामुळे चिघळले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व खटल्यांची संख्या निम्म्यावर आणण्यासाठी सामभारत अभियानाचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर शेतरस्त्यांची वाढ,नाल्यांवरील अतिक्रमणे दूर करणे व जलसंधारणाच्या कामास गती देण्यासाठी हे तंत्र प्रभावी ठरणार आहे.
निसर्गाचे नियम,देशाचे कायदे आणि वैयक्तिक जीवनातील नीतिमत्ता पायदळी तुडवून कोणालाही यश येऊ शकत नाही. त्यामुळे तडजोडीने आणि सामजस्याने छोटे आणि मोठे प्रश्न सुटू शकणार आहे.
पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातील शेतरस्त्याचा वाद आणि ओढे,नाल्यांवरील अतिक्रमणे जलसंधारणाच्या कामासाठी दूर करण्यासाठी या तंत्राचा वापर करणार असल्याचे असल्याचे अॅड.गवळी यांनी म्हंटले आहे.
या अभियानासाठी अॅड.गवळी,अशोक सब्बन,कॉ.बाबा आरगडे,जालिंदर बोरुडे,पै.नाना डोंगरे,विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती,सुधीर भद्रे,शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड,विठ्ठल सुरम,अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.