अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने खारेकर्जुने (ता. नगर) येथे मतदार जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. गावातील वाड्या वस्तींवर जाऊन घरातील कुटुंबीयांना मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करण्यात आले. तर मतदार यादीत नांव समाविष्ट करणे व मतदान करण्याबातची मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
खारेकर्जुने गावचे सरपंच प्रभाकर मगर व उपसरपंच अंकुश पाटील शेळके यांच्या हस्ते या मतदार जागृती अभियानाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, काशीनाथ पळसकर, रोहिदास गायकवाड, सचिन शेळके, अभिजीत शेळके, अक्षय निमसे, ह.भ.प. दास पाटील, रावसाहेब दरंदले, राजेंद्र कावरे, सुमंत वाघ, अक्षय पळसकर, योगेश पळसकर, सोनाली पळसकर, कोमल पळसकर आदी उपस्थित होते.
उपसरपंच अंकुश पाटील शेळके म्हणाले की, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी शंभर टक्के मतदान होण्याची गरज आहे. मतदान प्रक्रियेत युवक-युवतींसह ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी शंभर टक्क्के सहभाग नोंदविल्यास बदल घडणार आहे. 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. शंभर टक्के मतदान झाल्यास खर्या अर्थाने लोकशाही असतित्वात येणार असून, लोकशाहीच्या सदृढतेसाठी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृती कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. कमी होणारे मतदान हे लोकशाहीला घातक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. या राष्ट्रीय कर्तव्यासाठी जागृक राहून आपले नांव मतदार यादीत नोंदवून, मतदानाचा हक्क बजाविण्याचे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.