कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील आळसुंदे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या बि वन टेंडर मध्ये मनमानी कारभार करीत असून,यामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी गटविकास अधिकारी कर्जत यांच्याकडे लेखी केली आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी साहेबराव देशमुख,अनिल गोपीनाथ गाडे,जीवन उत्तम साळुंके, स्वप्नील साळुंखे,रमेश अनारसे व काकासाहेब अनारसे यांच्या सह्या व नावे आहेत.
या निवेदनामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, तालुक्यातील आळसुंदे ग्रामपंचायतीच्या दलित वस्ती सुधार योजना, १५ वा वित्त आयोग व इतर शासकीय निधी या कामाचे बी वन टेंडर काढून निविदा प्रक्रिया सर्वांना उपलब्ध करून देऊन नंतरच ती कामे निवेदने च्या नुसार अग्रक्रमाने मंजूर करावेत असा ग्रामपंचायत कायदा करण्यात आलेला आहे.
असे असताना या ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक अनिल भोईटे या बी वन टेंडर प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करीत असून ही सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतीने स्वतः पार पाडावयाची असताना ग्रामसेवक खाजगी व्यक्तींकडून हे निवेदी चे कामे करून घेत आहेत.वास्तविक पाहता या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवून संस्थेने या चे चलन भरण्याची आवश्यकता असताना संस्थेचे ऐवजी सर्व प्रक्रिया ग्रामसेवक स्वतः करीत आहेत,यामध्ये निविदा पुस्तक सुद्धा ग्रामसेवक स्वतः भरत आहेत असा गंभीर आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला असून विशेष म्हणजे या निविदांची सर्व प्रक्रिया ग्रामसेवक आपल्या वेळेनुसार आणि इच्छेनुसार करत आहेत.
ज्या दिवशी बी वन निविदा स्विकारण्याची तारीख आहे त्यादिवशी ग्रामसेवक जाणीवपूर्वक सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय बंद करून टाकतात व स्वतःच्या मर्जीतील संस्थेच्या मर्जी व्यतिरिक्त चौथ्या संस्थेला निविदेमध्ये भाग घेता आला नाही पाहिजे अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक ग्रामसेवक स्वतः करत आहेत, यामुळे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे सर्व एकत्र येऊन गावच्या विकासाचा निधी व त्याचे टेंडर स्वतःच्या मर्जीतील संस्थेच्या नावावर घेऊन स्वतःचा काम करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता शासकीय नियमानुसार सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यापैकी कोणालाही ग्रामपंचायतीचे टेंडर किंवा काम घेता येत नाही असे असताना देखील ग्रामसेवक या ठिकाणी स्वतः सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी घेऊन आपल्या मर्जीतील संस्थेच्या नावावर काम घेत आहेत आणि ही बाब अतिशय गंभीर असून या सर्व प्रकरणाची गटविकास अधिकारी यांनी हस्तक्षेप करून चौकशी करावी,अशी मागणी या सर्वांनी केली आहे.
याशिवाय ग्रामसेवक कार्यालय मध्ये उपलब्ध नसतात कामांमध्ये अनियमितता आहे. त्याचप्रमाणे निविदांमध्ये हस्तक्षेप करून ते शासकीय निधीचा अपहार करीत आहेत, अशा पद्धतीचे आरोप या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत. याबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याचप्रमाणे विभागीय आयुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अहमदनगर यांना देण्यात आल्या आहेत.