शेवगाव प्रतिनिधी – निकेत फलके
मागील काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात उघडीप दिली होती. परंतु सोमवार दि.३० रोजीच्या मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या संतत धारेमुळे काही भागात ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गावात नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने काही जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या सर्व नुकसानग्रस्त भागाची जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे यांनी पाहणी केली असून मदत कार्य सुरू केले आहे.
आज मंगळवार दि(३१) मध्यरात्रीपासून शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरुर, भगूर, कोरडगाव, वडुले, ठाकुर पिंपळगाव सह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्यांनी रुद्रावतार धारण केले असून नदीकाठची घरे पाण्याखाली गेली आहेत. घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे, पिके, गाड्या, संसारोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व परिस्थितीची जनशक्तीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे व जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर व लोकवस्तीत जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी आखेगाव, वरुर, भगूर येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जनशक्तीच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना जेवणाचे डबे पोचवले जात आहेत.