अभियंत्यांच्या योगदानातून शहराचा चेहरा मोहरा बदलेल – महापौर रोहिणी शेंडगे
अहमदनगर प्रतिनिधी – आज प्रत्येक क्षेत्रात अभियंतांचे योगदान मोठे आहे. कोणताही प्रकल्प हा अभियंतांच्या कल्पना शक्तीने नाविन्यपूर्णरित्या व चांगल्या पद्धतीने होत असतो. एखादी निर्माण केलेली वास्तू ही वर्षानुवर्षे नागरिकांच्या स्मरणात राहत असते. तिचा निर्माता हा अभियंता असतो. आज अनेक वास्तू अशा आहेत की आजही त्या चांगल्या सुस्थितीत आहेत. याचे श्रेय अभियंतांना जाते. अहमदनगर महानगर पालिकेच्यावतीनेही शहरात विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. सध्या सुरु असलेल्या फेज-2 व अमृत योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही अत्यंत अवघड प्रक्रिया अभियंतांच्या कल्पकतेने पूर्ण होत आहे, त्याबरोबर इतरही प्रलंबित कामे मार्गी लागत आहेत, ही कामे पूर्ण झाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलेल. सध्या मनपा मध्ये अभियंतांची कमरता असून, लवकरच भरती करण्यात येईल. या अभियंत्यांच्या योगदानातून नगर शहराचा विकास साधला जाईल, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
जागतिक अभियंता दिनानिमित्त महानगरपालिकेमधील सर्व अभियंतांचे सत्कार महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे, विजय पठारे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक संजय शेंडगे, नगर रचनाकार राम चारठणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, जल अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभागप्रमुख आर.जी. सातपुते, अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, इम्रान खान आदि उपस्थित होते.
यावेळी सुरेश इथापे म्हणाले, अहमदनगर महानगरपालिकेच्या विविध योजना राबविण्यात अभियंतांचे मोठे योगदान राहिले आहे. कोणतेही काम चांगल्या होण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकाची गरज लागत असते. अभियंत्यांच्या कल्पकतेने एखादे काम चांगल्या पद्धतीने सहजरित्या पूर्ण होत असते.त्यामुळे अभियंते हे महत्वाचा घटक आहेत.आपले शहर विकसित असावे, सुंदर असावे, असे प्रत्येक अभियंत्यांस वाटते, आपण केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, हे प्रत्येकाला वाटते. त्यादृष्टीने मनपातील सर्व अभियंते काम करत आहेत. आज अभियंता दिनी झालेल्या सत्काराने आम्हा सर्वांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वैभव जोशी, गणेश गाडळकर, सदानंद रोहकले, राहुल पडोळे, कल्याणकुमार बल्लाळ, प्रदीप ढगे, राहुल गिते, तिवारी, श्रीमती मुळे, राजेश लयचेट्टी, राजेंद्र नराल आदि उपस्थित होते. शेवटी शाम नळकांडे यांनी सर्वांचे आभार मानले.