अहमदनगर प्रतिनिधी :- दिपक कासवा
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणासह सहा जणांवर कारवाई करण्यात आलीय.काल पोलिसांनी चौघांना अटक केली.याप्रकरणी अहमदनगरमध्ये तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून कर्मचारी संघटना पाठोपाठ डॉक्टर संघटना देखील आक्रमक झाली आहे.
आम्ही कायदेशीर कारवाईला घाबरत नाही.कायद्याचा आदरच करतो.न्यायालय आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही.याची आम्हाला खात्री आहे’,असे स्पष्ट करत राज्यासह अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयाला अद्ययावत आग प्रतिबंधक यंत्रणा बसवून देण्याची मागणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय व कर्मचारी संघटनेने आज कामकाज बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.उद्या अत्यावश्यक सेवा वगळता नगर जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल बंद राहणार आहेत,असेही यावेळी सांगण्यात आले आहे.
शासनाच्या बेफिकीर कारभाराचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.शासनाचा धिक्कार असो,अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी व अधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.या आंदोलनात तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असले, तरी ते देखील आंदोलनामध्ये सहभागी असतील,अशी भूमिका महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी मांडली.
लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सपूर्ण महाराष्ट्र भर काम बंद आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
१.सर्व सरकारी रुग्णालयाच्या ठिकाणी फायर ऑटोमेशन सिस्टीम व स्मोक डिटेक्टर सिस्टीम यंत्रणा तसेच आग विझविण्याची यंत्रणा २४ x ७ उपलब्ध असलेली तातडीने बसवून मिळावी.
२.सर्व सरकारी रुग्णालयांचे दर सहा महिन्यांनी फायर सेफ्टी ऑडिट करण्यात यावे.प्रत्येक सरकारी रुग्णालयाच्या ठिकाणी अग्निशमन अधिकारी २४ x ७ उपलब्ध करून देण्यात यावा.
३.कोणत्याही शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी परिसेविका,अधिपरिचारिका व कक्षसेवक अथवा सफाईकर्मचारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या वैद्यकीय व्यक्तीला हे वरील १ ते २ मुद्द्याबाबतीत पात्रता नसलेले व पूर्णतः अप्रशिक्षीत असल्यामुळे सदरील रुग्णालयीन आग व वीज संबधीत दुर्घटनांना त्यांना व्यक्तीशः जबाबदार धरण्यात येऊ नये.
४.अहमदनगर आणि भंडारा आग दुर्घटनाची पुर्नरावृत्ती होऊ नये व गरीब निष्पाप रुग्णांचे बळी जाणार नाही त्यासाठीच्या सर्व उपाययोजना तज्ञ समिती स्थापन करून त्यानुसार सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
५.कायदेशीर प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जी प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर आम्ही कोणतीही भूमिका मांडणार नाही.
६.जोपर्यंत सदर मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत.