अहमदनगर (प्रतिनिधी)- चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त भिंगार जवळील बेलेश्वर मंदिरात भाविकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. जिल्हा रुग्णालय नेत्र विभाग व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 36 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात भाविकांनी उत्सफुर्तपणे नेत्रदानाचा संकल्प अर्ज भरला.
बेलेश्वर मंदिरात भाविकांनी मरणोत्तर नेत्रदानाची गरज व महत्त्व सांगण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे, यादव झोडगे, अनिल ताठे, प्रेमकुमार धोत्रे, गणेश घोरपडे, अनिल आंग्रे, मधुकर शेलार, कारभारी लोखंडे, लताबाई शेलार, भाग्यश्री जगदाळे आदी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, धार्मिकतेला सामाजिकतेची जोड दिल्यास परिवर्तन घडणार आहे. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. भारतीय समाजात नेत्रदान व अवयवदानबद्दल गैरसमजुती व अंधश्रध्दा असून, त्या जनजागृतीने दूर होणार आहे. आज देशात अनेक अंध व्यक्ती डोळ्यासाठी प्रतिक्षेत आहे. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार असल्याचे सांगून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचे भाविकांना आवाहन केले.
नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे यांनी शरीर हे नष्वर असून, मरताना नेत्रदान करुन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार आहे. फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालय नेत्र विभागाच्या माध्यमातून नेत्रदान जास्तीत जास्त होण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली जात आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळ ही काळाची गरज असून, मृत्यूनंतरही अवयवदानाने इतरांची गरज भागवून अवयवरुपाने जिवंत राहता येत असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रदानाच्या अहवानाला प्रतिसाद देत यावेळी अनेक भाविकांनी नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून दिले.