अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या ५६ व्या स्थापना दिनानिमित्त चेतना दिवस पाळून विविध मागण्यांसाठी टीव्ही सेंटर, मध्यवर्ती इमारत येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकार कर्मचार्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन असल्याने यापुढचा काळ हा आरपार लढाईचा असणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, खजिनदार श्रीकांत शिर्शिकर, उपाध्यक्ष विलास पेद्राम, विजय काकडे, बाळासाहेब वैद्य, मकरंद भारदे, सयाजीराव वाव्हळ, सुर्यपुजारी शेटे, अजय दळवी, विशाल कुंभार, नरोटे, शेटे, बडे, मांडे, नलिनी पाटील, श्रीमती हुडे, झरेकर, सोनवणे, जाधव, म्याना, कदम, गोरकर, दळवी, भांबरे, आळसे आदिंसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी बंधू-भगिनी सहभागी झाले होते.
बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या स्थापनेला 56 वर्षे पूर्ण झाले आहे. या प्रदीर्घ कालखंडात स्व. र.ग. कर्णिक, दिनकरराव कलवडे व योगीराज खोंडे यांनी संघटनेची स्थापना केली. या प्रदीर्घ कालावधीत संघटनेच्या एकजुटीच्या बळावर अनेकदा संघर्ष करून सर्व वेतन आयोग, केंद्राप्रमाणे रास्त व न्यायी सोयी सवलती आणि भत्ते पदरात पाडून घेतले आहे. या चेतना दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र मुंबई यांच्या आदेशानुसार राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयात समोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्र प्रमाणे 11 टक्के महागाई भत्ता मिळावा, सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, रखडलेल्या अनुकंपा नियुक्ती त्वरित कराव्या, बक्षी समितीचा दुसरा खंड प्रसिद्ध करावा आदी मागण्यांसाठी नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शासन व संघटना यांच्या परस्पर समन्वयाच्या सामंजस्यातून सर्व प्रलंबित मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत असा मध्यवर्ती संघटनेने आग्रह धरला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून सदरचे आंदोलन करण्यात आले.