- Advertisement -
अहमदनगर प्रतिनिधी –
नगर तालुक्यात चांगला पाऊस झाला असून, खरीपातील पिके पिके जोमदार येणार आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे खर्या अर्थाने पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्याचा लाभ पिकांना होणार आहे. त्यामुळे खरिपातील पिके चांगली येणार आहेत. नगर तालुक्यात अपेक्षित क्षेत्राच्या सुमारे 85 टक्के पेरणी झाली आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, पावसाने उसंत घेऊन मागील 3-4 दिवसांत तो पुन्हा परतल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातावरण आहे. खरीप पेरणीला त्यामुळे जीवनदान मिळाले आहे, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील मूग पिकाची उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंत्र अधिकारी रवींद्र माळी, नारायण करांडे यांनी पाहणी केली. यावेळी श्री. कापसे बोलत होते. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते.
श्री. कापसे पुढे म्हणाले की, सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, कापूस अशा खरिपातील पिकांची पेरणी झाली. पण पेरणीनंतर पाऊस लांबल्याने चिंता होती. आता पाऊस आल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पूर्वीच्या तुलनेत मागील 2 वर्षांपासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवून शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावून शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
श्री. पोपटराव नवले म्हणाले की, नगर तालुक्यात खरिपाची 85 टक्के पेरणी झाली असून, आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. खताचा पहिला मात्रा द्यावा. पेरणी झालेल्या भागात आंतर मशागत करावी. पावसाअभावी ज्यांची पेरणी राहिली असेल, त्यांना आता सोयाबीन व तूूर पेरणीची संधी आहे. 58 हजार 146 हेक्टरवर खरीप पेरणीचा कृषी विभागाची अपेक्षा होती. सुरुवातीला पाऊसही चांगला झाला. नगर तालुक्यात 49 हजार 751 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन, मूग, बाजरी, तूर, मका, कडवळ, कापूस, उडीद या प्रमुख पिकांचा यात समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने चिंताक्रांत असलेला शेतकरी आता पाऊस परतल्याने आनंदी आहेत, असे ते म्हणाले.
- Advertisement -