नगर शहरात संगमनेर सारखा विकास व्हावा यासाठी  आ. थोरात यांनी शहरातून आमदार व्हावे: दीप चव्हाण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहर बदलतय, त्याची महानगराकडे वाटचाल होतीये, अशा बोगस विकासाच्या कितीही आणाभाका घेतल्या तरी नगर हे निश्चित भौतिक विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे नगर शहराला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी संगमनेर, लोणी , श्रीरामपूर प्रमाणे नगर शहराचा विकास करण्यासाठी अहमदनगरला संगमनेरसारखे शहर करून विकासाचा संगम घडवण्यासाठी जेष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून आमदार व्हावे अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघात जो निकाल लागला त्यावरून विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मोठा उलटफेर होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. नगरकरांनी फसवा विकास दाखवणाऱ्या विद्यमान खासदाराला एकमतानं हरवले. त्यानंतर आता नगर शहर विधानसभा मतदारसंघात शहराच्या सर्वांगीण विकासाची जाण असलेले नेतृत्व मिळावे अशी नगरकरांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने दीप चव्हाण यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाला सर्वांनी मान्यता द्यावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे म्हटले आहे.

या संदर्भात ते लवकरच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाविकास आघाडीचे समन्वयक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते नगर शहराच्या विकासासाठी आग्रही असलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह  भेट घेणार आहेत. नगर शहराची जागा काँग्रेस पक्षाला सोडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात यावी अशी  ते सर्वांना गळ घालणार आहेत.

एकेकाळी नगर जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. दादाभाऊ कळमकर, माजी राज्यमंत्री असेरी, शिवाजीराव नागवडे, राजीव राजळे, थोरात साहेब यांनी आपल्या कार्यकाळात नगर जिल्ह्यासह राज्यात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आणि आपापली शहरे विकसित केली. संगमनेर शहरासह तालुका तर विकासाच्या प्रगतीपथावर प्रचंड घोडदौड करतो आहे. हरितक्रांती,  धवलक्रांती, औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांतीचे नगर जिल्ह्याचे मूळ उगमस्थान ते बनले आहे. संगमनेर बायपास रस्ता, त्या जवळून जाणारा समृद्धी महामार्ग, चंदनापरी घाटातून जाणारा नाशिक पुणे रस्ता यामुळे संगमनेरला नगर शहर सोडून इतर जिल्ह्याचा जलद संपर्क मिळाला आहे. तेथील राज्य परिवहन महामंडाळाचे बसस्थानक तर नवे विमान तळ असल्याचेच भासत आहे. अमृतवाहिनी उद्योग समूह,  राजहंस दूध, एस एन डी टी डेंटल कॉलेज, स्व. भाऊसाहेब थोरात शिक्षण संकुल, आणि  शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मेडिकल, इंजिनिअरिंग, आय टी क्षेत्रातील नवीनतम अभ्यासक्रम असलेल्या संस्था त्यांनी उभारल्या आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे.

आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात त्यांच्या रूपाने संगमनेरला थोरात साहेबांचे उत्तरदायित्व या आमदारकीच्या निवडणुकीत मिळावे आणि थोरात साहेबांनी नगर मधून निवडणूक लढवावी म्हणजे नगर शहराचा संगमनेर प्रमाणे शाश्वत विकास होईल. नगरमध्येही सहकारी साखर कारखाना, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची प्रगत औद्योगिक वसाहत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संकुले थोरात साहेबांच्या संकल्पनेतून येतील. फूड पार्क, आयटी पार्क, कार्गो हब नगरमध्ये होऊ शकेल. नगर पुणे रस्ता बारा पदरी आणि नगर पुणे रेल्वे तात्काळ सुरू होईल. इतकी वर्ष नगरला दादाभाऊ कळमकर आमदार अनिल राठोड यांच्यानंतर हक्काचा माणूस मिळालेला नाही. आता तर दहशत, गुंडगिरी, ताबेदारी याचा सपाटाच सध्या सुरु आहे. यामुळे नगर बदनाम होते आहे. अहमदनगरचे बदनामनगर झाले आहे. त्यामुळे नगर शहराचे नेतृत्व थोरात साहेबांनी करावे.

सुदैवाने विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता आल्यास नगर चे पालकमंत्री म्हणून थोरात साहेब नगरला विशेष शहराचा दर्जा देऊन मोठा निधी आणू शकतील. राज्य शासनाच्या स्मार्ट सिटीच्या धोरणात नगर शहराचा समावेश होऊ शकेल. तशी विकासाची दृष्टी फक्त थोरात साहेब यांच्याकडेच आहे. नगरकरांच्या भल्यासाठी थोरात साहेबांना उमेदवारी मिळावी अशी विनंती चव्हाण हे वरिष्ठांना करणार आहेत.

याबाबत नगर जिल्ह्यातील काँग्रेस नेते मंडळी आणि सर्व तालुकाध्यक्षासह कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक यासाठी बोलवावी आणि सकारात्मक चर्चा घडवून आणावी  यासाठी आपण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना आग्रह धरणार आहोत.  तसेच इतरांशी त्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे लवकरच ते वरिष्ठांची भेट घेणार आहेत.

२०१४ साली विधानसभेच्या निवणुकीत बाळासाहेब थोरात यांचे भाचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी थोरात साहेब आणि मा. आ. सुधीर तांबे यांची यंत्रणा नगरमध्ये निवणुकीत कार्यरत होती. आणि आता आ. निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी देखील या दोघांनी नगरमध्ये निवडणूक काळात आपली भरभक्कम यंत्रणा लावली त्यामुळे या विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीत म्हणजे २०१९ साली सुजय विखे यांना मिळालेलं मताधिक्य कमी झाले. आता जर साहेबच स्वतः उभे राहिले. त्यांची यंत्रणा आणि आम्ही कार्यकर्ते त्यांच्या सोबत असू आणि नगर शहराच्या विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठविण्याचा विषय होईल त्यावेळी थोरात साहेब यांनाच जनता डोक्यावर घेईल. स्थानिक गुंडगिरी, दहशत याला हे उत्तर असेल.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!