अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने मंगळवारी (१० ऑगस्ट) निषेध दिवस पाळून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली. बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चाने येऊन ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात संघटनेचे जनरल सेक्रेटरी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, एकनाथ सकट, राहुल चव्हाण, सतीश पवार, शब्बीर शेख, उत्तम कटारे, बाळासाहेब लोखंडे, कृष्णा थोरात, सुरेश पानसरे, बजरंग मुरमुडे, धोंडीभाऊ सातपुते, सचिन कुलट, रंगनाथ चांदणे, भाऊ जगधने आदी ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण होत नसल्याने सर्व कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने संपुर्ण जिल्ह्यात निषेध दिवस पाळण्यात आला. प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती समोर निषेध दिनानिमित्त निदर्शने करुन ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निवेदन दिले. 10 ऑगस्ट 2020 रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने काढलेल्या राजपत्राप्रमाणे किमान वेतनाचा राज्य शासनाने आदेश काढावेत व दहा ऑगस्ट 2020 पासून मागील फरकासह वेतन द्यावे, अभय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करावी, दहा टक्के आरक्षण याप्रमाणे जिल्हा परिषद सेवेत वर्ग तीन व चारच्या पदांवर भरती करण्यात यावी, राहणीमान भत्ता मिळावा, वसुली अट रद्द करून शंभर टक्के वेतन देण्यात यावे व ग्रामपंचायत कर्मचार्यांना विमा कवचाचा लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली.
राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारींच्या वाढीव वेतनसाठी १०१ कोटीची तरतूद करण्याची गरज आहे. या संदर्भात प्रस्ताव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी सदर फाईल अर्थ खात्याकडे मंजूरीस दिली आहे. मात्र वाढीव वेतनाची फाईल मंजूर झालेली नाही. ग्रामपंचायत कर्मचार्यांचा वाढीव वेतनाचा प्रश्न त्वरीत मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी दिला.