माझी माती, माझा देश अभियानातंर्गत घेतली पंचप्रण शपथ
कर्तव्य बजावणे ही नागरिकांची देश सेवाच -शिवाजी खरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त नेहरु युवा केंद्राच्या वतीने माझी माती, माझा देश अभियानातंर्गत शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला.तर वीर जवानांना अभिवादन करुन पंचप्रण शपथ घेण्यात आली.
नेहरु युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात यांच्या अध्यक्षतेखाली तर सीआरपीएफचे कैलास देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी सैनिक मेजर रावसाहेब काळे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड.महेश शिंदे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, श्रीकृष्ण मुरकुटे आदींसह आजी-माजी सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते.
प्रारंभी शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्य साखरबाई भोसले, अशोक मुसळे, कुसुमबाई किनकर, संगीता गांगर्डे यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाजी खरात म्हणाले की, देशाच्या सिमेवर रक्षण करणाचे सैनिकांचे ऋण न फेडता येणारे आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्याप्रति सर्वांनी कृतज्ञता ठेवली पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य बजावल्यास ती देश सेवाच ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कैलास देवडे यांनी सैनिक हा फक्त देशासाठी सर्वस्वी अर्पण करतो. वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देखील देतो. त्यांचा सन्मान हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. ज्या कुटुंबातील मुले देशासाठी शहीद झाले त्यांचा आदर बाळगण्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेजर रावसाहेब काळे म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृती स्फुर्ती व प्रेरणादायी आहे. या वीरांच्या स्मृतीला नमन करुन सक्षम भारत उभा राहत आहे. सिमेवर जीवाची बाजी लावून देश सेवा करणारे जवान खरे हिरो असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शिंदे यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश गाडगे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक निलेश थोरात, दिनेश शिंदे, सुरेश प्रधान, महेश काकडे, संदीप डोंगरे, महेश हापसे, रोहिणी काकडे, शामल दरंदले, कोमल दुगड, योगेश भागवत, वैभव लोखंडे, गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले. नेहरु युवा केंद्राच्या वतीने राष्ट्रीय सेवाकर्मी मार्फत प्रत्येक गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून शहीद कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे.