निमगाव वाघा (प्रतिनिधी)-
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या कार्याची आठवण म्हणून १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान देशभरात आजादी का महोत्सव साजरा होत असून’ नेहरू युवा केंद्र अहमदनगर आणि नवनाथ विद्यालय निमगाव वाघा (तालुका अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव आज नवनाथ विद्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा युवा अधिकारी शिवाजी खरात, संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, मंडळाचे अध्यक्ष नाना डोंगरे, सरपंच रुपाली जाधव आदींनी फिट इंडिया फ्रीडम रन आणि आजादी का अमृत महोत्सव याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
शिवाजी खरात यावेळी म्हणाले की, या मोहिमे अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये २ ऑक्टोबर पर्यन्त स्वछता पंधरवाडा, कोरोना जनजागृती, फिट इंडिया फ्रीडम रन घेण्यात येणार आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या माध्यमातून आपले निरोगी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे या वेळी त्यांनी फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. आपण आपल्या फिटनेसबाबत उदासिन राहू नये. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून, फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी होण्यासाठी पाऊल उचलायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. फिट इंडिया फ्रीडम रनचे उदघाटन शिवाजी खरात आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवनाथ विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभाग घेतला.