अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या महिन्यात कोकणात अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले. या पुरग्रस्त बांधवांच्या पाठिशी राज्य शासनाने खंबीरपणे उभे राहून तात्काळ मदतीचा हात दिला. त्याचबरोबर राज्यातील इतरही सामाजिक संस्था व उद्योजकांच्या मदतीचा ओघ सुरु आहे. त्यामुळे पुरग्रस्तांना उभारी मिळाली आहे. आता त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून पायभुत सुविधा उपलब्ध करुन त्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहेत. या कार्यास मदतीचे हात पुढे येत आहेत. प्रा.श्रीकांत निंबाळकर व मित्र परिवाराने दिलेल्या या मदतीमुळे पुरग्रस्तांचे दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी अशा प्रकारे मदतीचा हात दिला तर तेथील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कोकणातील पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी प्रा.श्रीकांत निंबाळकर व मित्र परिवाराच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतीचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, अभिजित खोसे, संजय अनभुले, अॅड.विक्रम वाडेकर, डॉ.अविनाश मोरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.श्रीकांत निंबाळकर म्हणाले, कोकणात उद्भवलेली पुरपरिस्थिती भयानक होती, तेथील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या बांधवांना पुन्हा उभे करण्याचे काम शासनाच्यावतीने सुरु आहे, त्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या दृष्टीने आम्हीही मदत केली आहे. आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रत्येकाने या आपत्ती काळात आपल्या बांधवांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी अविनाश घुले म्हणाले, नैसर्गिक आपत्ती ही दुर्दैवी असून, यामुळे कोकणातील परिस्थिती बिकट झाली आहे, अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. प्रा.निंबाळकर व मित्र मंडळाने केलेल्या मदतीची इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.