सरकारला जाग आणून जाब विचारण्यासाठी रस्त्यावरची लढाईची घोषणा -विष्णुभाऊ कसबे
लहुजी शक्ती सेनेच्या बैठकीत मातंग समाजाच्या प्रश्नावर चर्चा
जिल्हा पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
मातंग समाजाची प्रलंबीत प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार उदासिनतेची भूमिका दाखवत आहे. सरकारला जाग आणून जाब विचारण्यासाठी मातंग समाजाला एकत्र घेऊन लहुजी शक्ती सेना रस्त्यावरची लढाईची घोषणा करण्यात आली असल्याचे प्रतिपादन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी केले. तर मंत्रालयावर समाजबांधवांचा धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुकारण्यात येणार्या आंदोलन व संघटनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश खरात, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष देवा कढरे, उत्तर महाराष्ट्र राज्य संघटक जितेंद्र सोनवणे, तुकाराम सोळसे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे म्हणाले की, राज्यात मातंग समाजावर अन्याय, अत्याचार वाढत आहे. हा अत्याचार रोखण्यासाठी लहुजी शक्ती सेनेने एक चळवळ उभी केली आहे. समाजाच्या न्याय, हक्काच्या मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून सर्वच शासकीय कार्यालयावर धाऊन सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिनेश खरात यांनी गावागावात लहुजी शक्ती सेनेची शाखा निर्माण करुन एका झेंड्याखाली समाजबांधवांना एकत्र केले जाणार असल्याचे सांगितले. जितेंद्र सोनवणे यांनी मातंग समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लहुजी शक्ती सेना मोर्चे बांधणी करत आहे. सरकारला इशारा देण्यासाठी राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीत जिल्हा व तालुका पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आला. नुतन पदाधिकार्यांना संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अनेक युवकांनी लहुजी शक्ती सेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.