अहमदनगर प्रतिनिधी – श्री क्षेत्र शिर्डी ते पंढरपूर असा सोळा वर्षापासून सुरू असलेला पालखी सोहळा दोन तिर्थक्षेत्रांना जोडण्याचे मोठे अध्यात्मिक कार्य करीत असल्याचे समाधान आहेच, परंतू वारकरी संप्रदायाच्या सेवेतील आनंद हीच आमची पुण्याई असल्याचे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यानी केले.
श्री.साईबाबा संस्थानच्या सहकार्याने दरवर्षीच पंढरपूर वारीकरीता पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात येते.या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सोळावे वर्ष आहे.महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे डॉ विखे पाटील फौडनशच्या प्रांगणात आगमन झाले.आ.राधाकृष्ण विखे यांनी या पालखीचे दर्शन घेवून वारकऱ्यांचे स्वागत केले.

आषाढी वारीच्या निमिताने सध्या बहुतांशी देवस्थानच्या पालख्या विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.दिंड्यामध्ये सहभागी झालेल्या वारकर्यांना सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून विळद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौडनशच्या वतीने दरवर्षीच पाहुणचारा बरोबर आरोग्य सुविधा देण्याचा सेवाभाव जपला जातो.गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही परंपरा विखे पाटील परीवाराने वारकरी सांप्रदायाशी असलेल्या ॠणानुबंधातून जपली आहे.
श्री.क्षेत्र शिर्डी येथून विश्वरत्न सद्गुरू श्री.साईबाबा भव्य पालखी सोहळा फौंडेशनच्या प्रांगणात दाखल होताच साईविठ्ठलाचा जयघोष करण्यात आला.सलग सोळा वर्षापासून महामंडलेश्वर श्री कनकानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या पालखी सोहळ्याने दोन तिर्थक्षेत्रांना अध्यात्माच्या माध्यमातून जोडण्याचे अध्यात्मिक कार्य निरंतरपणे सुरू असल्याचा आनंद मोठा असल्याची भावनिकता आ.विखे पाटील यांनी वारकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली.
वारकारी सांप्रदायाने समाजाला जोडण्याचे काम केले.त्यामुळेच त्यांची सेवा करण्याचे पुण्य विखे पाटील परीवाराला वर्षानुवर्षे मिळत आहे.या परीसरात आरोग्य सेवा घडत आहेच परंतू तुम्हा वारकर्याप्रती असलेला सेवाभाव आम्हाला अनेक वर्षे जपता येतो याचे मोठे समाधान असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.
महामंडलेश्वर श्री.काशिकानंदजी महाराज यांनी शिर्डीहून निघणाऱ्या या पालखी सोहळ्याचा चौथ्या दिवसाचा मुक्काम हा फौडेंशनच्या प्रांगणात ठरलेला असतो.आ.राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी संस्थानचे विश्वस्त असताना या पालखी सोहळ्याची सुरूवात झाली.हा वारसा आम्ही सोळा वर्षापासून जपत असल्याचे सांगतानच विखे कुटुंबियांनी सुध्दा या पालखी सोहळ्याच्या आगत्यात कमतरता ठेवली नसल्याचे आवर्जून सांगितले.
सरला बेट येथून महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दिंडीचेही स्वागत विखे परीवाराच्या वतीने करण्यात आले.
नगर मनमाड मार्गावरून सध्या मोठ्या संख्येने पालख्या पंढरपूरकडे रवाना होत आहे.डॉ विखे पाटील फौडनशच्या वतीने चहा पाणी स्वच्छता गृह यांची व्यवस्था करण्यात आली आहे.याठिकाणीच तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला असून डाॅक्टरांचे पथक इथे ठेवण्यात आले असल्याचे खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
काही पालख्या परंपरेने त्यांच्या नियोजनानूसार मुक्कामी थांबतात त्यांच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्थाही फौडेंशनच्या माध्यमातून करण्यात येते.याकरीता माझ्यासह फौडेशनचे अधिकारी कर्मचारी उत्साहाने यासर्व सेवाकार्यात देत असलेला सहभाग आनंददायी असल्याचे डाॅ.विखे म्हणाले.