अहमदनगर प्रतिनिधी – भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या अहमदनगर येथील मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी ) विभागात प्रशिक्षण पूर्ण करून २४१ जवानांनी देशनिष्ठेची शपथ घेतली.
मेजर जनरल पदमसिंह शेखावत यावेळी म्हणाले की, सैनिकांनी प्रामाणिकपणा ,सचोटी आणि देशाप्रती अभिमान बाळगून आपले काम करावे असे आवाहन केले.
प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा पंकज यादव बेस्ट रिक्रुट ठरला असून त्याचा ‘जनरल सुंदर जी गोल्ड मेडल’ देऊन गौरव करण्यात आला. तर, रिक्रुट दयाराम गुर्जर याचा ‘जनरल के. एल. डिसूजा सिल्वर मेडल’ आणि रिक्रुट आशिक राय याचा ‘जनरल पंकज जोशी कांस्यपदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. आज शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे आगमन झाले. मेजर जनरल पदमसिंह शेखावत सेना मेडल यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली आणि संचलनाची पाहणी केली. त्यानंतर एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) आणण्यात आले. धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा आणि समर्पणाची शपथ दिली.