नगर मनमाड रोड वरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी.
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर मनमाड हायवे हा एन एच ए आय कडे वर्ग करण्यात आलेला आहे सदर रस्त्यावर अत्यंत जड स्वरूपाची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्यावर अनेक जीवघेणे खड्डे पडले असून ते त्वरित बुजवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी नगर तालुका च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निखिल शेलार समवेत रोहिदास कर्डिले, शरद भाऊ पवार, प्रकाश पोटे,अमित गांधी, दीपक गुगळे, गणेश निमसे, शहानवाज शेख, शहबाज शेख, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
नगर पासून ते राहुरी पर्यंत साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर रोड वर खूप मोठ मोठे, खड्डे पडलेले आहेत. त्यात आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावलेला आहे.यापूर्वी देखील काही महिन्यापूर्वीच याच रोडवरील खड्डे बुजवले गेले होते.परंतु अवघ्या दोन ते तीन पावसात रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि आता तर हा रस्ता नॅशनल हायवे कडे वर्ग करण्यात आल्यामुळे यानंतर खड्ड्याच्या पॅकिंगचे काम हे अतिशय उत्कृष्ट होईल अशी आशा लागली आहे.
लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या आठ दिवसात खड्डे व्यवस्थित बुजून रोड पूर्ववत करावा,अन्यथा राष्ट्रवादी नगर तालुका च्या वतीने एन एच ए आय अहमदनगर मनमाड हायवे यांच्या कार्यालयावर २६ सप्टेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.