शेतकरी आंदोलना पुढे हुकुमशहा नमला – प्रा.ज्ञानेश्वर दराडे
अहमदनगर(प्रतिनिधी) – सर्व क्षेत्राचा अभ्यास असलेले व्यक्तीमत्व म्हणून ना. शरद पवार यांची देशात ओळख आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे धोरण त्यांनी राबविले. महिला सक्षमीकरण घडवून आनले. सामाजिक आयुष्य ते जगत असून, महाराष्ट्रासह देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी केले.
तर केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, देश मोठ्या संकटातून जात आहे.केंद्र सरकार खाजगीकरणाचा घाट घालून,सर्वसामान्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे पाप करीत असल्याचा आरोप करुन शेतकरी आंदोलना पुढे हुकुमशहा नमला आहे.नागरिकांनी जागे होण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा.डॉ. संजय कळमकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर,ओबीसी सेलचे अमित खामकर, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ,विद्यार्थी शहराध्यक्ष वैभव ढाकणे, राज्य महिला आघाडीच्या अॅड.शारदा लगड, ज्ञानेश्वर रासकर, सुमतीलाल कोठारी,अशोक बाबर,किसनराव लोटके, प्रा.अरविंद शिंदे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, संजय झिंजे,डॉ.रणजीत सत्रे,दादा दरेकर, सिध्दार्थ आढाव, संतोष ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, जॉय लोखंडे, गणेश बोरुडे, लहू कराळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.दराडे म्हणाले की, सध्या देश मोठ्या संकटातून जात आहे.महागाई, बेरोजगारी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, जातीय तेढ असे अनेक प्रश्न भेडसावत आहे. नोटाबंदी व जीएसटीनंतर अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, कोरोनाने त्यात आनखी भर पडली आहे. जीडीपी नियंत्रणात नसून, रुपयाचे मुल्य दिवसंदिवस घसरत आहे. ही गंभीर परिस्थिती नागरिकांनी समजण्याची गरज आहे.
ही अवस्था केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.पंतप्रधान सामान्यांशी मन की बात आणि भांडवलदारांची धन की बात करत आहेत. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वर्षभर काळे कृषी कायदे मागे घेण्यासाठी संघर्ष करावा लागला.
दिल्लीच्या सिमेवर अनेक आंदोलक शेतकरी शहीद झाले.शेवटी तिन्ही कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. कायदे मागे घेतले असले तरी, दुसर्या माध्यमातून हे कायदे लादण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.
पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.प्रास्ताविक प्रा.अरविंद शिंदे यांनी केले. यावेळी राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची रोहिनी झिने व न्यू आर्टस महाविद्यालयाचा प्रविण काजळे यांनी आपल्या भाषणात ना.शरद पवार यांच्या जीवनपट उलगडला.दोन्ही विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रा.संजय कळमकर म्हणाले की, शेतकर्यांबद्दल जाणता नेता म्हणून ना.शरद पवार यांची ओळख आहे.बारामती पॅटर्न त्यांनी देशाला दिला. सहकार क्षेत्राने दूरदृष्टी ठेऊन त्यांनी विकासात्मक व्हिजन महाराष्ट्राला दिले.
समाजात काय चालले याचे भान ठेवणारा, सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध असलेला सामान्य माणसांपर्यंत नाते जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. कपडे, वाहन, थाट, लवाजमाने नव्हे तर विकासाचे धोरण, कार्यकर्त्यांना जपण्याची वृत्ती, शेवटच्या घटकांना न्याय देण्याची ताकत याने नेता बनतो.
ना.पवार यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत रक्तवाहिन्या प्रमाणे राष्ट्रवादी पक्ष वाढविला असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या रुपाने संस्कारी व लढाऊ नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपल्या नेत्याची कार्याची शैली व पद्धत माहिती करुन घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सानप यांनी केले. आभार संजय सपकाळ यांनी मानले.