नवी दिल्ली – दररोज वाढणाऱ्या पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे.वाढत्या महागाईवरुन भाजपचे खासदार डॉ.सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर स्वामींनी जोरदार टीका केली आहे.तर,पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही टिकास्त्र सोडलं आहे.
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज सकाळीच एक ट्विट केलं आहे.या ट्विटमधून त्यांनी तिखट शब्दांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थमंत्रालयावर निशाणा साधला आहे.रोज पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरांमध्ये होणाऱ्या वाढीमुळं देशात उठाव निर्माण होण्याची परिस्थिती तयार होत आहे.अर्थमंत्रालयामुळंच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अस स्वामी यांनी म्हटलं आहे.
तसंच,अर्थमंत्रालयाच्या वैचारिक दारिद्रयामुळेच हे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच,हा देशद्रोह असल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.अर्थसंकल्पातील तूट ही अशापद्धतीने दरवाढ करुन भरुन काढणे हे आर्थिक परिस्थिती हाळण्याची क्षमता नसल्याचं लक्षण आहे,असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांत वारंवार इंधन दरवाढ करण्यात आली.त्यामुळे भाजीपाला,किराणा माल,कडधान्ये,गॅसच्या जीवनावश्यक सर्व वस्तूंची भाववाढ होत आहे.महागाईमुळे सर्वसामान्य जनता ग्रस्त झाली आहे.२२ मार्चपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे.गेल्या १५ दिवसांत तेरावेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.गेल्या १५ दिवसांत तब्बल ९ रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.