अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील झारेकर गल्लीत अज्ञात व्यक्तींनी पाडलेल्या स्वच्छता गृहाच्या जागेवर उद्यान उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महापौर रोहोणी शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी हर्षदा संदुपटला, योगेश नल्ला, वेणूगोपाल एकलपेल्ली,सुरज संदुपटला,अक्षय आकुबत्तीन,कैलास आगरकर,वैभव शिंदे,रमेश शेलार,संगिता सब्बन,सचिन पवार,वंदना मच्चा आदी उपस्थित होते.

झारेकर गल्लीतील स्वच्छतागृह काही व्यक्तींनी शनिवारी रात्रीतून जमीनदोस्त केले.हे काम कोणी व का केले? माहित नाही.परंतु परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने हिताचे झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिक अनेक वर्षापासून महानगरपालिकेला सदरचे स्वच्छतागृह इतर ठिकाणी हलविण्याची किंवा बंद करण्याची मागणी करत होते.या स्वच्छतागृहाचा नागरिकांना मोठा त्रास होत होता.
स्वच्छतागृह असलेली अस्वच्छता,दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले होते.तर अनेक नागरिक आजारी देखील पडले.यामुळे या भागात राहणे असुरक्षित वाटू लागल्याने काहींनी दुसर्या ठिकाणी राहण्यासाठी स्थलांतर देखील केले.
खुप वर्षापूर्वी जेव्हा कोणाकडे शौचालय नव्हते,त्यावेळी या शौचालयाची गरज पडायची.मात्र आता प्रत्येकाच्या घरात शौचालयाची व्यवस्था असल्याने या स्वच्छता गृहाचा उपयोग स्थानिक नागरिकांना होत नव्हता.तर रस्त्यावरून येणारे जाणारे व्यक्ती याचा वापर करत होते.
मात्र या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने परिणामी घाण होऊन परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
झारेकर गल्लीत पाडण्यात आलेल्या स्वच्छता गृहाच्या जागेवर पुन्हा स्वच्छतागृह न उभारता उद्यान उभारण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.