शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने निर्माण झालेल्या शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकदिनी राज्य सरकारला स्मरणपत्र देण्याचा इशारा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात बोडखे यांनी आमदार गाणार व शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून चर्चा केली. केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचार्यांना वाढीव महागाई भत्ता मिळालेला नाही. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर यांच्या भविष्य निर्वाह निधीची बी.डी.एस. प्रणाली बंद करुन शिक्षक व कर्मचार्यांची आर्थिक कोंडी शासनाने केली आहे. तसेच दरमहा प्रत्येक जिल्ह्याला अपुरे वेतन अनुदान देण्यात येत आहे. अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वयानुरूप अनुदान दिले जात नाही. या सर्व प्रकाराने शिक्षक व कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. अनेकांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव, फायनल विड्रालचे प्रस्ताव व वैद्यकीय देयके गेल्या तीन ते चार महिन्यापासून प्रलंबित आहेत. अशा प्रकारच्या आर्थिक कोंडीमुळे अनेकांना आपल्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे, घरातील ज्येष्ठांचे औषधोपचार करणे अशक्य झाले आहे. अंशतः अनुदानित शिक्षकांचे वेतन नियमित नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. काहीजण पेन्शन प्रलंबीत असतानाच सेवानिवृत्त झाले असल्याचे प्रश्न बोडखे यांनी मांडले.
या सर्व प्रश्नांवर शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असून, राज्य सरकारला जाग आनण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला जाणार असल्याचे आमदार गाणार व पूजाताई चौधरी यांनी स्पष्ट केले. तर शिक्षकदिनी राज्य सरकारला स्मरणपत्र देण्याचे सुतोवाच करण्यात आले. तसेच सदर प्रश्नासंदर्भात स्मरणपत्र देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यास शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, कोषाध्यक्ष नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे, माजी आमदार संजीवनीताई रायकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, प्रा. सुनिल पंडित, मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे आदी सर्व विभागातील कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.