अहमदनगर(प्रतिनिधी)- शेतकयांच्या आंदोलनामुळे पारीत करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले.एक वर्षाच्या आंदोलनानंतर शेतकरी घरी परतू लागले असून,त्यांचे जागोजागी स्वागत व आनंदोत्सव साजरा होत आहे.
रविवारी (दि.१२ डिसेंबर) शहरातील नगर-औरंगाबाद महामार्गावरील एसी डेपो गुरुद्वारा समोर मोर्चा फतेह कार्यक्रमातंर्गत विजयोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना मोतीचूरचे लाडू व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
किसान मजदूर एकता जिंदाबादच्या घोषणा देत, विजयगीत गाऊन हा विजयोत्सव जल्लोषात साजरा झाला.
यावेळी सुखविंदरसिंग सुखा, हरजितसिंह वधवा, राजू मदान, जीगतारसिंह, गुरभेजसिंह, गुरुमितसिंह, पुनितसिंह भुटानी, परमजितसिंह, सुखविंदरसिंह सुखी, मुख्त्यारसिंह, बक्षीस सिंह, परमजितसिंह, हरविंदर नारंग, पियुषसिंह, करण धुप्पड, बलजितसिंह वधवा, रणवीरसिंह आदी शीख, पंजाबी समाजबांधवांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
सुखविंदरसिंग सुखा म्हणाले की, शेतकरी आंदोलनाचे हे अभूतपूर्व यश असून, हे शेतकरी, कामगार एकतेचा विजय आहे.तिन्ही कृषी कायदे शेतकर्यांच्या दृष्टीने घातक होते.यामुळे भविष्यात शेतकरींचे जीवन उध्वस्त झाले असते.या विरोधात देशातील शेतकरी एकवटले व त्यांच्या संघर्षाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, देश सुजलाम, सुफलाम होण्यासाठी शेतकरी वर्गाचा मोठा वाटा आहे.कृषी कायदे मागे घेण्यासाठी अन्नदाता शेतकरी वर्गाला वर्षभरापेक्षा जास्त कालावधी आंदोलन करावे लागले.या आंदोलनात अनेक शेतकरी शहीद झाले.
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असून, यामध्ये शेतकरी वर्गाचा विजय आहे.सर्व शेतकरी वर्ग घरी परतताना त्यांच्या घरी दिवाळी सारखा आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रविवारी दिवसभर नागरिकांना वडापाव, चहा व मोतीचूर लाडूचे वाटप कार्यक्रमस्थळी सुरु होते.