शेवगाव प्रतिनिधी – शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावातील व्यक्तीने अनाधिकृत नळ कनेक्शन घेतल्याने त्या ठिकाणी मुंगी गावचे सरपंच बबन भुसारी व ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांनी संबंधित व्यक्तीला सदरचे अनाधिकृत नळ कनेक्शन हे नियमित करून घेण्यासंबंधी समजावून सांगण्यासाठी गेले.परंतु सदर इसमाने राग मनात धरून सरपंच बबन भुसारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.
गावचा प्रमुख म्हणून जबाबदारीने भान ठेवून कर्तव्य पार पाडत असताना गावच्या प्रमुखावर म्हणजे सरपंचावर असा जीवघेणा हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे.गावच्या सरपंचाचे एक प्रकारे खच्चीकरण आहे, अशाप्रकारे गावगुंड विधायक कामात आडकाठी आणून गावचा विकास कामांना खिळ घालत असतील तर गावच्या विकासात त्या गावच्या सरपंचांनी कसे योगदान द्यावयाचे असा गंभीर प्रश्न उभा राहतो,अशा गावगुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केली आहे.
या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत.तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख श्री.मनोज पाटील यांची आम्ही समक्ष भेट घेऊन निवेदन देणार आहोत.जोपर्यंत या हल्लेखोर गावगुंडांवर योग्य ती कारवाई होऊन अटक होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील असे सरपंच परिषद अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.