अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाने जीवनात क्रांती घडणार आहे. कोणत्याही स्पर्धेला न घाबरता परिस्थितीला सामोरे जाण्याचे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. शालेय जीवनात यशस्वी होऊन बाहेर पडताना अथांग अशा स्पर्धेच्या युगात स्वच्छंदपणे आवडीचे क्षेत्र निवडण्याचा सल्ला पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांनी दिला. तर पालकांना आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर न लादता त्यांना मुक्तपणे आपले क्षेत्र निवडू देण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहरातील गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एसएससी दहावी व एचएससी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त शरद क्यादर, उपाध्यक्ष विलास पेद्राम, खजिनदार जयंत रंगा, विश्वस्त राजू म्याना आदिंसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष सिद्दम यांच्या हस्ते इयत्ता दहावी मध्ये शाळेत प्रथम- श्रेया सुरम, द्वितीय- अक्षय व्यवहारे, तृतीय- राजश्री इंगळे तर इयत्ता बारावी मधील प्रथम- श्रध्दा कांबळे, द्वितीय- अनिकेत दुव्वा, तृतीय- रेखा वैराळ यांचा सत्कार करण्यात आला. विश्वस्त राजू म्याना यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये रोख बक्षिस दिले.
सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक दिपक रामदिन यांनी कोणताही व्यवसाय व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, अगोदर उत्तम माणुस म्हणून जगता आले पाहिजे. दुसर्यांच्या मदतीला नेहमी धावून जाण्याचा व आई-वडिल व गुरुजनांचा सन्मान करण्याचे सांगितले. उपमुख्याध्यापक पांडूरंग गोने यांनी विद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी दातृत्वाची भावना ठेऊन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन केले. इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक संदीप छिंदम यांनी स्पर्धेच्या युगात जिद्द व कष्टाच्या जोरावर यशस्वी होता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करण्याचे आवाहन केले.
शिक्षक प्रतिनिधी प्रा. भानुदास बेरड यांनी जिद्द अंगीकारल्यास जीवनात कोणतेही ध्येय प्राप्त करता येते. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी गर्दी मागे न धावता स्वत:ची वेगळी वाट निर्माण करण्याचे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये जीवनात यश प्राप्त करत असताना विद्यालय व गुरुजनांचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या संकटकाळात गुरुजनांनी योग्य मार्गदर्शन केल्याने यश गाठू शकलो असल्याची भावना व्यक्त केली. दहावी व बारावीचा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असताना संस्थेच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तानाजी काळूंगे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश आनंदास, मथुरा आढाव, सुहास बोडके, अजय न्यालपेल्ली, प्रमोद अंकम यांनी परिश्रम घेतले.