रक्तदान करुन रुग्णांची प्राण वाचविण्यास मदत करावी – नगरसेवक दत्ता कावरे
अहमदनगर प्रतिनिधी – एका जणाच्या रक्तदानाने अनेकांना उपयोग होत असल्याने प्रत्येकाने रक्तदान करुन गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत केली पाहिजे. आज कोरोनामुळे रक्तदात्यांचे प्रमाणात घट झाली आहे, त्यामुळे अनेक रुग्णांना रक्तची गरज भासत आहे. रक्त हे कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने ही गरज भागविण्यासाठी व रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. अशा परिस्थितीत युवकांनी पुढाकार घेत ही रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभारली पाहिजे. संगम तरुण मंडळाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन रक्तदान शिबीर घेऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांची आज गरज आहे, असे प्रतिपादन नगरसेवक दत्ता कावरे यांनी केले.
संगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे, ऋषीकेश कावरे, आनंद जाधव, चैतन्य थोरात, ओंकार लगड, दिपक सोनवणे, तुषार हाळसे, नितीन काकडे, सुषमा वैद्य, भाग्यश्री पवार, गणेश मोकाशे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सुषमा वैद्य म्हणाल्या, सध्या कोरोना व लसीकरणामुळे अनेक रक्तदात्यांना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. त्यामुळे जे रक्तदानासाठी सक्षम आहेत, त्यांनी रक्तदान करुन गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. संगम तरुण मंडळ व आदर्श पॅरामेडिकल यांनी रक्तदान शिबीराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. अशा शिबीराची आज गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ऋषीकेश कावरे म्हणाले, संगम तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो, परंतु सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध आले आहेत. त्यामुळे सामाजिक दायित्व जपत रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. मंडळाच्यावतीने वर्षभर सामाजिक कार्य राबविण्यात येत असतात. त्यात कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत असतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद जाधव यांनी केले तर आभार चैतन्य थोरात यांनी मानले.