अहमदनगर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यातील साखर व जोडधंद्यामध्ये काम करणार्या कामगारांना बारा टक्के पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णयाच्या करारावर सोमवारी (दि.4 ऑक्टोबर) स्वाक्षर्या करण्यात आल्या.साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे झालेल्या त्रिपक्षीय सदस्यांची अंतिम बैठक पार पडली.या बैठकित सदर करारावर स्वाक्षर्या झाल्या.साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढ देण्यासाठीचा शासन निर्णय निर्गमीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकतीच साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढीची घोषणा करण्यात आली होती. बारा टक्के वेतनवाढीचा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी या करारावर सर्व त्रिपक्षीय सदस्यांच्या सह्या आवश्यक होते. त्या स्वाक्षर्या झाल्याने सदर शासन निर्णय निर्गमीत होण्याचा मार्ग मोकळा झाला.या शासन निर्णयाची प्रत लवकरच राज्यातील सर्व साखर कारखान्यांना प्राप्त होणार आहे.
या बैठकीस समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कारखाना प्रतिनिधी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त रविराज ईळवे, अशोक साखर कारखान्याचे भानुदास मुरकुटे, श्रीगोंदा साखर कारखान्याचे राजेंद्र नागवडे, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, शंकरराव भोसले, राऊ पाटील, राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, नेवासा तालुका राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक पवार, फेडरेशनचे खजिनदार डी.एम. निमसे आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.