अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी अंतरिक व बाह्य स्वच्छता महत्त्वाची आहे. सार्वजनिक स्वच्छता प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गाव निरोगी राहून वातावरण प्रसन्न राहण्यासाठी गावात स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, साथीचे आजार टाळण्यासाठी केर, कचरा व घाण पाणी साचू न देता, नियमीत स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व उमंग फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता पंधरवडातंर्गत पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे सार्वजनिक स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला. गावात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. गिर्हे बोलत होते. यावेळी सरपंच चंद्रकला वाघ, उपसरपंच राजश्री आल्हाट, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, प्रविण निकाळजे, संतोष आल्हाट, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल आल्हाट, माजी सरपंच ईस्माइल शेख, विश्वनाथ माळी, सागर माळी, सावळेराम बर्डे, अमोल माळी, विशाल बर्डे, रामा काकडे, अशोक सातपुते, नंदू खरपुडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिर्हे यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करुन उपस्थितांना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ दिली. पाहुण्यांचे स्वागत महेंद्र गिर्हे यांनी केले. सरपंच चंद्रकला वाघ यांनी गावात स्वच्छता ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. मात्र सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास गाव स्वच्छ व निर्मळ होणार आहे. सार्वजनिक स्वच्छता ही काळाची गरज असून, उमंग फाऊंडेशनने राबविलेल्या जनजागृती कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, अॅड. भानुदास होले, अॅड. महेश शिंदे, अॅड. अनिता दिघे, स्वच्छता दूत डॉ. अमोल बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.