अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यदिनी शहरात विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृती व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, माहेर फाउंडेशन व रसिक रंजन कलाविष्कार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
ऐतिहासिक भुईकोट किल्ला, फराह बाग, तारकपूर, झारेकर गल्ली, बेलेश्वर चौक, बुर्हाणनगर या ठिकाणी मतदार जागृती व सार्वजनिक स्वच्छतेचे संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या पथनाट्यामध्ये ज्यु. दादा कोंडके फेम अनिल पाटोळे, डॉ. धीरज ससाणे, रोहिणी कांबळे, पूर्वा हरिप, अलका गंधे, प्रियंका नगरकर, साक्षी बनकर, माधुरी सोळसे, जयेश शिंदे, काजल सोळसे, रूपाली क्षीरसागर, संजय सोळसे, माहेरच्या अध्यक्षा रजनी ताठे, प्रशांत शिवचरण, श्याम कांबळे, अजय पठारे, शरद वाघमारे यांनी सहभाग घेतला होता.
पथनाट्यातून कोणत्याही प्रलोभन, दबाव व आमिषाला बळी न पडता, तसेच साडीचोळी, जेवणावळी, वस्तू, सहली यांना भीक न घालता योग्य उमदवाराला मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. तर मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले. विनोदी शैलीत डॉ. धीरज ससाणे यांनी पथनाट्यातून मतदान व स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. रजनीताई ताठे यांनी सार्वजनिक स्वच्छता न पाळल्याने समाजामध्ये रोगराई पसरत आहे. महिलांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यास पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले. तसेच केरकचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले, अॅड. अनिता दिघे, अॅड. महेश शिंदे, अॅड. सुनिल तोडकर, पोपट बनकर, डॉ. अमोल बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.